“मी ६९ वर्षांची आहे आणि आयुष्याच्या जास्तीत जास्त काळ एक गृहिणी म्हणून खूपच व्यस्त राहिले आहे. माझ्या मुलांचे संगोपन, सासू-सासरे यांची देखरेख आणि माझ्या पतींच्या सततच्या व्यवसायाच्या दौऱ्यांमुळे माझ्या रोजच्या कामांची एक ठरलेली दिनचर्या होती. मात्र, मुलं मोठी झाली, स्वतःच्या वाटेवर गेली. सासू-सासऱ्यांचं निधन झालं आणि घरात आम्ही दोघेच उरलो. आता खूप मोकळा वेळ मिळत होता. पूर्वी घर गजबजलेलं असायचं, आणि अचानक २-३ वर्षांत शांतता पसरली. दुपारी वेळ जात नव्हता. सकाळी सर्व कामं उरकून टाकायचे आणि संध्याकाळी शेजारच्या स्त्रियांशी गप्पा किंवा बागेत फेरफटका मारायचे. पण दुपारच्या शांततेत खूप एकटं वाटायचं. पतींनाही काम असल्यामुळे ते पूर्ण वेळ उपलब्ध नव्हते. एकटेपणामुळे अस्वस्थता वाढत होती. मग मी ठरवलं की काहीतरी करायला हवं. मला शिवणकामाची आवड होती, आणि मी त्यात चांगली होते. सुरुवातीला मी खूप कपडे शिवले. माझ्या मुलांसाठीही कपडे शिवले होते. आता दरवर्षी मी शिवणकाम शिकवते आणि अनाथालयात कपडे दान करते. मी आमच्या कॉलनीत नुकतंच एक वाचन मंडळ सुरू केलं आहे. महिन्याच्या शेवटी आम्ही सगळे भेटतो आणि पुस्तकांवर चर्चा करतो. हे सगळं सुरू करताना वेळ लागला, पण हळूहळू या नव्या जीवनशैलीत रमले आहे."
-श्रीमती देशमुख
"नमस्कार! मी श्री. वय ७६ वर्षे. मी माझ्या पत्नीसोबत राहतो. माझ्या दोन मुली परदेशात स्थायिक आहेत. मला श्रवणशक्तीच्या कमतरतेचा त्रास आहे. मी श्रवणयंत्र वापरतो, परंतु तरीही समोरच्याचे बोलणे समजून घेण्यासाठी खूप एकाग्रता लागते. श्रवणयंत्र वापरूनही मला फारसे ऐकू येत नाही. या श्रवणशक्तीच्या कमतरतेमुळे माझ्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. मी बाहेरच्या कामात पत्नीला मदत करू शकत नाही. किराणा सामान खरेदीसाठी किंवा बँकेत गेल्यास, उत्तर द्यायला वेळ लागत असल्यामुळे समोरील व्यक्ती चिडते. व्यक्तीने हळू बोलणे आवश्यक असते, जेणेकरून मी ओठांच्या हालचालींवरून काय बोलले जात आहे ते समजू शकेन. गर्दीच्या वेळेत हे अधिक कठीण होते. याशिवाय, कोणीतरी सोबत असणे गरजेचे आहे, कारण मला वाहनांचे हॉर्न ऐकू येत नाहीत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो, आणि रस्ता ओलांडण्याचा आत्मविश्वासही कमी झाला आहे. गेल्या ७-८ वर्षांत माझ्या श्रवणशक्ती घटत गेली आणि त्याबाबत काहीच करता आले नाही. अनेक उपचार घेतले, पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. या श्रवणशक्तीच्या घटामुळे माझ्या जीवनात एक अवलंबित्व आणि एकटेपणाची भावना निर्माण झाली. मात्र, आता मी या परिस्थितीशी जुळवून घेतले आहे. मी पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि लघुकथा लिहू लागलो. मागील वर्षी मी सांकेतिक भाषा शिकून घेतली आणि आता मी माझ्या मुली आणि नातेवाईकांशी नियमितपणे व्हिडिओ कॉलवर संवाद साधतो. माझे कुटुंबीय संयमाने आणि समजून घेत संवाद साधतात. हा संवाद, शिकणे, वाचन, लेखन या गोष्टींनी माझा आत्मविश्वास वाढवला आहे, मला व्यस्त आणि उत्पादक ठेवले आहे. माझ्या मर्यादांशी जुळवून घेणे मी शिकलो आहे, आणि या प्रवासात माझ्या पत्नीने मला सतत आधार दिला आहे."
-श्री पवार साहेब
“नमस्कार! मी एक शिक्षक आहे. मी हायस्कूलमध्ये अध्यापन केले आहे आणि सेवानिवृत्तीनंतर माझ्या स्वतःच्या शिकवणी वर्गांची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला, आणि सध्या तेच करत आहे. मी माझ्या अध्यापन कौशल्यांमध्ये नवनवीन प्रयोग केले आहेत. माझ्या घराच्या मागील अंगणात एक लहान प्रयोगशाळा तयार केली आहे, जिथे मी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील मूलभूत प्रयोग करून त्यांना रसायनशास्त्राची अधिक समज वाढेल आणि आवड निर्माण होईल असे बघत असतो. तसेच, मी विद्यार्थ्यांसाठी घराजवळच्या टेकडीवर पायी चालण्याच्या फेरफटक्यांचे आणि संग्रहालयाच्या भेटींचे आयोजन करतो. यामध्ये त्यांना वनस्पतीशास्त्र आणि प्राणिशास्त्राच्या अभ्यासाविषयी रुची निर्माण होते. त्यांना विज्ञानविषयात रुची घेताना बघून समाधान मिळते. हा रिटायरमेंट नंतरचा काळ अतिशय उत्तम चालला आहे म्हणून स्वतःला भाग्यवान समजतो.”
-श्री जगदाळे सर