Loading...
मराठी English

सामाजिक कल्याण

सामाजिक अलिप्तता आणि एकटेपणा



सामाजिक अलिप्तता* म्हणजे इतर लोकांशी होणारा संपर्क कमी असणे किंवा संवादासाठी पुरेशा व्यक्ती उपलब्ध नसणे.

एकटेपणा म्हणजे एकटे असल्याची किंवा वेगळे पडल्याची अस्वस्थ करणारी भावना.

एखादा व्यक्ती लोकांच्या उपस्थितीतही एकटेपणा जाणवू शकतो, तसेच एकटे राहूनही त्याला सामाजिक अलिप्ततेचा किंवा एकटेपणाचा अनुभव येईलच असे नाही.

Image

एकाकीपणा किंवा सामाजिक अलिप्ततेमुळे आरोग्यावर कसा परिणाम होऊ शकतो?



वय वाढल्यास, व्यक्तीला सामाजिकदृष्ट्या अलिप्त होण्याची आणि एकटेपणा अनुभवण्याची शक्यता वाढते. हे आरोग्यात होणारे बदल आणि सामाजिक संबंधांमध्ये होणाऱ्या घटकांमुळे होते, ज्यात ऐकण्याच्या समस्यांमुळे, कमी दृष्टीक्षमता, स्मृती कमी होणे, अपंगत्व, हालचाल करण्यास असमर्थता, तसेच कुटुंब आणि मित्रांचे नुकसान यांचा समावेश आहे.

जर तुमचे आरोग्य खराब असेल, तर तुम्हाला सामाजिकदृष्ट्या अलिप्त होण्याची किंवा एकटेपणाचा अनुभव होण्याची शक्यता जास्त असू शकते. त्याचबरोबर, जर तुम्ही सामाजिकदृष्ट्या अलिप्त असाल किंवा एकटेपणा अनुभवत असाल, तर यामुळे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.
एकटे असलेले किंवा सामाजिकदृष्ट्या अलिप्त असलेले लोक कमी व्यायाम करतात, त्यांना सहसा चांगली झोप येत नाही, आणि ते अधिक धोकादायक वर्तनांमध्ये सहभागी होण्याची शक्यता जास्त असते, जसे की मद्यपान, धूम्रपान, आणि तंबाखूचे सेवन. यामुळे हृदयरोग, मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढतो.

एकटेपणाचा अनुभव घेत असलेले लोक भावनिक वेदना भोगतात. संबंधाची भावना गमावल्यामुळे व्यक्तीच्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. भावनिक वेदना शरीरातील शारीरिक वेदनेसारख्याच ताण-तणावाच्या प्रतिक्रिया सक्रिय करु शकतात. अशी परिस्थिती सुरू राहिल्यास ती दीर्घकालीन जळजळ आणि कमी झालेली रोगप्रतिकारक क्षमता याकडे नेऊ शकते. यामुळे व्यक्तीला दीर्घकालीन रोग आणि काही संसर्गजन्य रोगांचा धोका निर्माण होतो.

सामाजिक अलिप्तता आणि एकटेपण मानसिक आरोग्यावरही परिणाम करतात. सामाजिकदृष्ट्या अलिप्त असणे आणि एकटेपण अनुभवणे हे कमी झालेल्या संज्ञानात्मक कार्यप्रणालीशी आणि नैराश्य, मनोभ्रंश, आणि विशेषत: अल्झायमर्स रोगाच्या धोका वाढवणारे असते. तसेच, कमी सामाजिक क्रियाकलाप आणि बहुतेक वेळा एकटं राहणे संज्ञानात्मक कार्य कमी होण्यास कारणीभूत ठरू शकते आणि त्यामुळे दररोजच्या कामकाजांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात, जसे की गाडी चालवणे, बिल भरणे, औषधे घेणे आणि स्वयंपाक करणे.

०१
"माझ्याकडे घरकामं इतकी आहेत की, बाहेर जाऊन लोकांशी बोलण्यास वेळच मिळत नाही."
०२
“कुटुंबासोबत राहून आणि माझ्या आजुबाजूला लोक असतानाही, मला एकटेपणाचा अनुभव होतो”
०३
“माझ्या पती/पत्नीचे निधन होईल, तर मला एकटं वाटेल, अशी मला चिंता आहे”
०४
“निवृत्तीनंतर माझं आयुष्य कंटाळवाणं आणि निरर्थक झालं आहे. या काळात मला एकटं आणि निरुपयोगी वाटतं”


०५
“मी माझ्या जुन्या मित्रांशी संपर्क गमावला आहे आणि आता मी एकटा आहे”
०६
“माझा पती/पत्नी आता जगात नाही. तो/ती सोबत नसल्यास, मी आनंदी कसा होऊ?”
०७
“आता मला कुणाला तरी आवश्यक वाटत नाही.”


विचारांची प्रक्रिया आणि एकटेपण



वयोमानानुसार अशा प्रकारचे विचार आपल्या मनात येणे अत्यंत स्वाभाविक आहे. आपली मुले मोठी होऊन स्वावलंबी होतात, आपल्या जबाबदाऱ्या हळूहळू कमी होतात, आणि आयुष्याचा गतीमानता मंदावते. यामुळे रिकामेपणाची भावना निर्माण होऊ शकते.

तथापि, हे लक्षात घेतले पाहिजे की, हे आपल्या जीवनाच्या एका नवीन टप्प्याची सुरूवात होऊ शकते. वयोवृद्धतेला एक नवीन दृष्टीकोनातून पाहणे आवश्यक आहे.

निवृत्ती, मुले शिक्षणासाठी किंवा करिअरसाठी घर सोडतात, यामुळे आपल्याकडे खूप मोकळा वेळ उरणारा असतो, आणि त्या वेळेचा उपयोग आपल्याला चांगल्या प्रकारे करणे आवश्यक आहे. असे विचार आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात. एकटेपणाच्या भावना निर्माण होणं, कमी अन्न घेणं, आरोग्याच्या तक्रारींमुळे व्यायाम थांबवणं, स्वतःला एकाकी करणं आणि संवाद टाळणं हे सर्व एकत्रितपणे एकटेपण, नैराश्य आणि आरोग्याच्या स्थितीचा ह्रास घडवून आणू शकते. म्हणून,
सकारात्मक विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे!

मी कधी सामाजिक वेगळेपण आणि एकटेपणाच्या धोक्यात असू शकतो?



  • एकटे राहत असाल.
  • घराबाहेर जाणे शक्य नसेल
  • जीवनातील महत्त्वपूर्ण बदलांसारख्या घडामोडी घडलेल्या असतील, जसे निवृत्ती.
  • मोठ्या प्रमाणावर हानी भोगली असेल (संसर्ग, जोडीदार/साथीदार/निकटवर्तीयांचे निधन).
  • आर्थिक संकटांचा सामना करत असाल
  • देखभाल करणारा असाल आणि २४ तास सेवा व देखभाल आवश्यक असलेल्या व्यक्तीची काळजी घेत असाल.
  • मानसिक किंवा ज्ञानवृद्धीविषयक अडचणींचा सामना करत असाल.
  • असुरक्षित ठिकाणी राहत असाल किंवा शेजारी दूर असलेले असू शकतात
  • भाषेच्या अडचणींचा अनुभव घेत असाल
  • जातीय, सांस्कृतिक, लैंगिक, वयाच्या भेदभावाचा सामना करत असाल
  • जीवनातील उद्दिष्टाचा अभाव किंवा तो हरवलेला असावा


मी माझा सामाजिक सहभाग कसा सुधारू शकतो?



काही ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचा सामाजिक सहभाग कसा सुधारला?



“मी ६९ वर्षांची आहे आणि आयुष्याच्या जास्तीत जास्त काळ एक गृहिणी म्हणून खूपच व्यस्त राहिले आहे. माझ्या मुलांचे संगोपन, सासू-सासरे यांची देखरेख आणि माझ्या पतींच्या सततच्या व्यवसायाच्या दौऱ्यांमुळे माझ्या रोजच्या कामांची एक ठरलेली दिनचर्या होती. मात्र, मुलं मोठी झाली, स्वतःच्या वाटेवर गेली. सासू-सासऱ्यांचं निधन झालं आणि घरात आम्ही दोघेच उरलो. आता खूप मोकळा वेळ मिळत होता. पूर्वी घर गजबजलेलं असायचं, आणि अचानक २-३ वर्षांत शांतता पसरली. दुपारी वेळ जात नव्हता. सकाळी सर्व कामं उरकून टाकायचे आणि संध्याकाळी शेजारच्या स्त्रियांशी गप्पा किंवा बागेत फेरफटका मारायचे. पण दुपारच्या शांततेत खूप एकटं वाटायचं. पतींनाही काम असल्यामुळे ते पूर्ण वेळ उपलब्ध नव्हते. एकटेपणामुळे अस्वस्थता वाढत होती. मग मी ठरवलं की काहीतरी करायला हवं. मला शिवणकामाची आवड होती, आणि मी त्यात चांगली होते. सुरुवातीला मी खूप कपडे शिवले. माझ्या मुलांसाठीही कपडे शिवले होते. आता दरवर्षी मी शिवणकाम शिकवते आणि अनाथालयात कपडे दान करते. मी आमच्या कॉलनीत नुकतंच एक वाचन मंडळ सुरू केलं आहे. महिन्याच्या शेवटी आम्ही सगळे भेटतो आणि पुस्तकांवर चर्चा करतो. हे सगळं सुरू करताना वेळ लागला, पण हळूहळू या नव्या जीवनशैलीत रमले आहे."

-श्रीमती देशमुख

"नमस्कार! मी श्री. वय ७६ वर्षे. मी माझ्या पत्नीसोबत राहतो. माझ्या दोन मुली परदेशात स्थायिक आहेत. मला श्रवणशक्तीच्या कमतरतेचा त्रास आहे. मी श्रवणयंत्र वापरतो, परंतु तरीही समोरच्याचे बोलणे समजून घेण्यासाठी खूप एकाग्रता लागते. श्रवणयंत्र वापरूनही मला फारसे ऐकू येत नाही. या श्रवणशक्तीच्या कमतरतेमुळे माझ्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. मी बाहेरच्या कामात पत्नीला मदत करू शकत नाही. किराणा सामान खरेदीसाठी किंवा बँकेत गेल्यास, उत्तर द्यायला वेळ लागत असल्यामुळे समोरील व्यक्ती चिडते. व्यक्तीने हळू बोलणे आवश्यक असते, जेणेकरून मी ओठांच्या हालचालींवरून काय बोलले जात आहे ते समजू शकेन. गर्दीच्या वेळेत हे अधिक कठीण होते. याशिवाय, कोणीतरी सोबत असणे गरजेचे आहे, कारण मला वाहनांचे हॉर्न ऐकू येत नाहीत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो, आणि रस्ता ओलांडण्याचा आत्मविश्वासही कमी झाला आहे. गेल्या ७-८ वर्षांत माझ्या श्रवणशक्ती घटत गेली आणि त्याबाबत काहीच करता आले नाही. अनेक उपचार घेतले, पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. या श्रवणशक्तीच्या घटामुळे माझ्या जीवनात एक अवलंबित्व आणि एकटेपणाची भावना निर्माण झाली. मात्र, आता मी या परिस्थितीशी जुळवून घेतले आहे. मी पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि लघुकथा लिहू लागलो. मागील वर्षी मी सांकेतिक भाषा शिकून घेतली आणि आता मी माझ्या मुली आणि नातेवाईकांशी नियमितपणे व्हिडिओ कॉलवर संवाद साधतो. माझे कुटुंबीय संयमाने आणि समजून घेत संवाद साधतात. हा संवाद, शिकणे, वाचन, लेखन या गोष्टींनी माझा आत्मविश्वास वाढवला आहे, मला व्यस्त आणि उत्पादक ठेवले आहे. माझ्या मर्यादांशी जुळवून घेणे मी शिकलो आहे, आणि या प्रवासात माझ्या पत्नीने मला सतत आधार दिला आहे."

-श्री पवार साहेब

“नमस्कार! मी एक शिक्षक आहे. मी हायस्कूलमध्ये अध्यापन केले आहे आणि सेवानिवृत्तीनंतर माझ्या स्वतःच्या शिकवणी वर्गांची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला, आणि सध्या तेच करत आहे. मी माझ्या अध्यापन कौशल्यांमध्ये नवनवीन प्रयोग केले आहेत. माझ्या घराच्या मागील अंगणात एक लहान प्रयोगशाळा तयार केली आहे, जिथे मी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील मूलभूत प्रयोग करून त्यांना रसायनशास्त्राची अधिक समज वाढेल आणि आवड निर्माण होईल असे बघत असतो. तसेच, मी विद्यार्थ्यांसाठी घराजवळच्या टेकडीवर पायी चालण्याच्या फेरफटक्यांचे आणि संग्रहालयाच्या भेटींचे आयोजन करतो. यामध्ये त्यांना वनस्पतीशास्त्र आणि प्राणिशास्त्राच्या अभ्यासाविषयी रुची निर्माण होते. त्यांना विज्ञानविषयात रुची घेताना बघून समाधान मिळते. हा रिटायरमेंट नंतरचा काळ अतिशय उत्तम चालला आहे म्हणून स्वतःला भाग्यवान समजतो.”

-श्री जगदाळे सर